आंबा पिकावरील नैसर्गिक संकटे कृती दल रोखणार

Payal Bhegade
13 Dec 2023
Blog

अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीट, आंबा बागांमध्ये होणारा तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडीचा प्रादुर्भाव वेळेतच रोखता यावा, याकरिता कोकणातीलआंबा पिकासाठी कृती दलाची निर्मिती करण्यात आली. आंबा पिकावर येणारी संकटे वेळेत रोखण्यासाठी संशोधन करण्याची मुख्य जबाबदारी टास्क फोर्सची असेल. आठ सदस्यीय समितीत दापोली कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचा समावेश आहे. यासाठी कोकणातील शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील अधिकाऱ्यांबरोबरच तत्काळ बैठक घेत 'कृती दल' स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समितीमुळे कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. द्राक्ष, ऊस पिकाच्या संरक्षणासाठी कृती दल आहे. मात्र, कोकणातील आंबा पिकासाठी आतापर्यंत असे कृती दल कार्यान्वित नव्हते. कोकणात सातत्याने आंबा पिकावर संकट येत आहे. त्यामुळे आंबा पीक घ्यावे की नाही, या विवंचनेत जिल्ह्यातील आंबा उत्पादक आहे.

जिल्ह्यात घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेला पूर्वपट्टा व समुद्रकिनाऱ्यालगतचा पश्चिमपट्टा असे दोन भाग पडतात. फेब्रुवारी, मार्चपर्यंत किनारपट्टीचे श्रीवर्धन, म्हसळा, मुरूड, अलिबाग या समुद्रीपट्ट्यात आणि नजीकच्या भागात आंबा पीक येते; तर पूर्व पट्ट्यातील महाड, पोलादपूर, सुधागड-पाली, कर्जत, खालापूर या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये आंबा लागवड होते.

'सद्यस्थितीतील फळांचा भरोसा नाही'
- सध्या झाडांवर वरकरणी फळे दिसत असली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याचे बागायतदार सांगतात. पूर्व पट्ट्याच्या तुलनेत पश्चिम पट्ट्यात अद्याप अवकाळीचे प्रमाण कमीच होते.
- त्यामुळे जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, सुधागड-पाली, कर्जत या पूर्व पट्ट्यातील तालुक्यात आंबा उत्पादन घ्यावे की घेऊ नये, असा प्रश्न बागायतदारांसमोर आहे. अशा येणाऱ्या संकटांमधून मार्गदर्शन करण्यासाठी कृती दलामधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.